Saturday 25 April 2020

बंदिस्त

   काही दिवसांपूर्वी मी डिजिटल मार्केटिंगवर एक पुस्तक लिहिलं. त्यात माझी एक ओळ होती , हल्ली माणुस हा सोशल प्राणी राहिलेला नाही तर तो सोशलमीडिया प्राणी झालेला आहे. आज सहजच ते वाक्य पुन्हा वाचल्या गेलं आणि माझं मलाच हसु आलं. साधारण दीड महिन्यापूर्वी  ती ओळ लिहीत असताना आपण किती बिझी असतो आज सगळं कसं एका क्लीक वर लागतं. आपलं आयुष्य किती व्यस्त आहे असे सगळे मनात विचार होते. आज मात्र परिस्थिती अगदी विरुद्ध आहे. आज वेळचं वेळ आहे. जो वेळ मिळत नाही म्हणुन आपली सारखी रडारड असायची आज तो मिळाल्यावर काय करावं सुचत नाही आहे. आता 3 मे नंतर लॉकडाऊन ही कल्पना पण नाही करवत...? बरोबर ना. आता करणार काय, कारण सगळ्या रेसीपीज करून झाल्या, त्याचे फोटो काढुन पोस्ट करणं झाले. सगळे खेळ खेळुन संपले. रामायण - महाभारत, शक्तिमान सगळं पाहुन झालं.  सुरवातीला मजा आली, रोज सगळ्यांसोबत व्हिडीओ कॉल , मग त्याचे स्क्रीनशॉट घेऊन फोटो टाकुन झाले, ऑनलाइन लुडो, चेस, सगळं खेळून झालं. सोशलमीडियाचा पूर्णपणे वापर झाला. विनाकारण सकाळी चार -चार पर्यंत जागून  वेबसिरीज बघुन झाल्या, पुस्तके वाचुन झाली. तरीही अस्वस्थता का...?,  आपल्यातले हरवलेले सगळे गुण गवसले असं वाटलं सुरवातीला .पण आता काही दिवसांचा आराम आता शिक्षा वाटायला लागली. आता मात्र घराच्या बाहेर पडावस वाटतं. हो वाटतंच ना! कारण आपल्याला माणसांत राहायची सवय झाली आहे. हो माणुस हा सामाजिक  प्राणी आहे. त्याला समाजापासून वेगळं करणं शक्य नाही. आपण कितीही डिजिटल झालो तरीही आपण चार भिंतीत कोंडुन नाही राहू शकत. हे मात्र ह्यावरून सिद्ध झालं. रविवारच महत्त्व तर आता राहिलंच नाही. ती सुट्टीची हुरहूर संपली.कुठलं प्लॅनिंग नाही, घरच्यांना वेळ देत नाही म्हणुन त्यांची किरकिर नाही,  कुठल्या मित्र-मैत्रिणीला भेटणं नाही,बाहेरचं खाण नाही, सगळं बंद. पण तरीही आयुष्य थांबलं नाही.कारण आपल्याला आशा आहे आज ना उद्या हे सगळं सुरळीत होणार आपण बाहेर पडणार.  ह्या एका आशेवर आपण  धीर धरून आहोत. हल्ली सगळीकडून एकच आवाज येतोय लवकर लॉकडाऊन उघडावा, आणि पिंजऱ्यातुन सुटका व्हावी. आपण कितीही आधुनिकतेचा  आव आणला आणि म्हणालो मला कुणाचीही गरज नाही, किंवा आजकाल कुणाला कुणाशीही घेणदेण नाही तरीही माणसाला माणुस लागतो. हे पुन्हा आपल्याला कोरोना शिकवून गेला. जर असं नसत तर आजही आपलं वर्क फॉर्म होम चालुच आहे. तरीही आपल्याला कंटाळा आला न! उलट घरच्या बेडवर बसुन काम करण्यासारखं सुख नाही. पण आज तेच सुख बोचायला  लागलंय.  तसा सोशल डिस्टन्स हा आपल्याला पाळायचा आहे.  एरवी तर आपलं मन  सोशल डिस्टन्स पाळतच असतं . त्याला अजिबात कुणामध्येही जावं वाटत नाही. सगळ्यांच असच होत नाही का..? पण तरीही आता मात्र त्यालाही लोकांमध्ये जावं वाटतंय कमाल आहे नाही का..?
© Neha R Dhole.

Monday 20 April 2020

त्या नजरेतील वास्तव

ठिकाण बुधवार पेठ:
आज रविवार सुट्टीचा दिवस ,भयंकर गर्दी एकदाची गाडी मंडईच्या पार्किंग मध्ये पार्क केली. आणि जीवात जीव आला. रविवारी दुपारी पार्किंग मिळणं म्हणजे अश्यक्य गोष्ट वा आधी देवाचे आभार मानले. आज तर आमचा शॉपिंगचा प्लॅन होता. आम्ही सगळे बहिण भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी राहतो, त्यामुळे सगळे वेगवेगळेच आले. एव्हाना ते दुकानात गेलेही होते. मला लोकेशन पाठवलं होत. ताराचंद दाखवत होत. हे दुकान काही माझ्या परिचयाच नव्हतं. त्यामुळे मी कॉल करून विचारण्या पेक्षा सरळ मॅप चा आधार घेतला आणि पायीच निघाले. आणि मग काय जे सगळ्यांच कधी कधी ना कधी होत तेच आज माझं झालं मी ही गेले "त्या" एरिया मध्ये हे मला तेव्हा कळाल जेव्हा मला तिथे  त्या दिसल्या . मी तिथे पोहचली होती जी वस्ती सो कॉल्ड सभ्य लोकांची नाही. क्षणाचा ही विलंब न लावता मी पावलांचा वेग वाढवला. एकदा आतापर्यंत फक्त ऐकलेलं च होत हे सगळं. ते ही दबक्या आवाजांमध्ये. आता प्रत्यक्ष डोळ्यांसमोर दिसत होतं एक वेगळंच जग. प्रसिद्ध शहरातील कुप्रसिद्ध ठिकाण बुधवार पेठ. छोटा रस्ता एकमेकींना खेटून उभ्या राहिलेल्या त्या सगळ्या इतकी गर्दी , आणि स्वच्छता नावाचा प्रकार ही तिथे दिसत नव्हता वाटलं परत जावं आणि दुसऱ्या रस्त्याने जावं. पण मॅप फक्त 2 मिनिट्स दाखवत होत म्हणून चालत राहिले. त्यात त्यांचे ते इशारे शी मला तर किळासच येत होती. मनात फार राग होता ह्या बायकांबद्दल म्हणूनच तुच्छतेने का होईना पण वर बघायचं ठरवलं आणि मी तिच्या कडे एक तिरका कटाक्ष टाकला. आणि काय योगायोग तिनेही माझ्याकडे पाहिलं. मी लगेच समोर बघितलं खूप होत्या तिच्या सारख्याच कमी जास्त वयाच्या. शी किती घाणेरडी mentality आहे ह्यांची दुसऱ्यांना आकर्षित करण्यासाठी किती exposed करायचं!. तितक्यात खांद्यावर एक हात पडला थांब....!!!!!
तो आवाज ऐकून राग, द्वेष , भीती सगळं एकदाच उफाळून आल. आणि तिच्या त्या हाताच्या स्पर्शाने तर मला शिसारीच आली. मी मागे वळून पाहिलं ती च होती. साधारण माझ्याच वयाची. हो तीही विसीतलीच असणार  भडक मेकअप, डार्क लिपस्टिक, आणि डीप गळ्याचा टॉप खाली सलवार आणि ओढणी का घेतली हवं हेच कळत नव्हतं. कारण त्याचा उपयोग तर होताना दिसत नव्हता.आणि त्यात तिने कुठलातरी लो क्वालिटी परफ्यूम मारला होता तो वास तर एकदम डोक्यातच गेला
सगळंच कस अगदी लो क्वालिटी च वाटत होतं. 
काय काम आहे? मी थोड वरच्या आवाजातच विचारल. भीती मलाही वाटत होती पण दाखवायची नव्हती.

का बघत होती? तीने सरळ प्रश्न केला.
आता माझ्या कडे उत्तर नव्हते. असच लक्ष गेलं मीही नजर चोरत उत्तर दिलं.

इतना क्यू डर रही?
तिच्या त्या भाषेवरून आणि चेहऱ्यावरून नक्कीच ती महाराष्ट्रातील नव्हती हे कळत होतं. पण मराठी तितकीशी बोलता येत नसली तरी समजत मात्र नक्की असावी तिला.

नाही मी का घाबरू ! मी उगाचच आव आणत म्हणाले.

मुझे बाकीका तो पढना नहीं आता लेकींन चेहरे बहुत अच्छी तरह से पढने आते हे!

आता मात्र मी अगदी निरुत्तर च झाले एरवी सडेतोड उत्तरे देणारी मी आता शब्दच सुचत नव्हते. आणि मी हिला का बोलतीये? चल निघ इथून माझ्या मनाचा आतून आवाज आला आणि मी म्हणाले. उशीर होतोय !

रुक लेट हो रहा हे या शरम आरी मेरेसे बात करनेमे?

तिच्या ह्या प्रश्नाने माझा चेहराच पाहण्यासारखा झाला. हिला कस कळलं? काय करू थांबू का ऐकू का हिला काय म्हणायचं की जाऊ? पण पुन्हा कधी अशी कोणी बोलणारी भेटेल? आणि मी तिचं ऐकायचं ठरवलं.

बोल काय म्हणायचं आहे तुला?

पुछना तो तुझे था ना? क्या सोच क्या रही थी?
आता मात्र मलाही माझ्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे हवी होती.

का करतेस हे सगळं? आयुष्य खूप सुंदर आहे अग.

माझ्या ह्या बोलण्यावर ती फक्त हसली ते हसणं खूप भेसूर वाटत होतं.

बस ये बोलणा था निकल! ती म्हणाली.

मला कळलच नाही ती अशी का बोलतीये. मी तिच्याच चेहऱ्याकडे पाहत राहिले.

हिंदी समझती नही क्या निघ इथून! खूप भेटतात तुझ्यासारखे भाषण देणारे! आणि तिने पुन्हा इशारे करायला सुरुवात केली.

पर एक बार सुन तो मेरी बात. मी तिला म्हणाले.

तु गयी नही अब तक! क्यू धंदे के टाईम पर दिमाग चाट री हे। जा ना अपने रास्ते.

काय भाषा मला तर ते ऐकूनच किळस येत होती. पण म्हंटल ह्या नंतर तर मी इथे येणार नाही. मग आज ही अनायसे भेटली तर बोलूनच घेवू.

हे बघ तु मला थांबवलं आता मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्या शिवाय मी जाणार नाही.  मी ही थोडं निर्धारानेच बोलले. तशी ती थोडी चमकली.कितीतरी वेळ ती काही बोललीच नाही पण मी ही हटणार नाही म्हंटल्यावर. तीने बोलायला सुरुवात केली.

हे बघ आम्ही अस जर केलं नाही तर आम्हाला जेवायला मिळणार नाही. बस इतना काफी हे तेरे लिये! जा अब , ती म्हणाली.

अग पण बाहेर खुप नोकऱ्या आहेत, कुठलही काम करावं कष्टाचं खावं, शांत झोपावं. अस वाटत नाही का तुला? मी म्हणाले.

ये आम्ही काही हरामाच खात नाही हा...! दिवसभर  उभं राहून एखाद गिऱ्हाईक मिळत, आणि त्यानंतर होणार त्रास छोड, हम जैसो को तो एखादा गिऱ्हाईक मुश्किल से मिलता, तिकडे बघ रेश्मा, तिने एका बाई कडे हात दाखवला, अभि 35 की हुई ये, एकेकाळी खुप कमावलं तिने आता बघ आठ आठ दिवस कुणी पाहत पण नाही तिच्याकडे, आणि काय ग आम्ही बाहेर पडलो तर लोक देतील आम्हाला नोकऱ्या कुठून आलो सांगितलंकिच चार हात दूर पळतील  आणि दुरुन त्याच घाणेरड्या नजरांनी पाहतील. आमच्या सारख्या बायका आहेत म्हणून तुम्ही इतकं चांगलं जगु शकत आहे. नाहीतर हया जनावरांनी तुमचा जीव घेतला असता. मी आज ठरवलं ना बाहेर निघायचं तरीही नाही निघू शकणार , कारण तुमच्या सारखे सभ्य लोक आम्हाला जगु देणार नाही, भूतकाळातील त्याच खपल्या काढून पुन्हा जखमा देतील. इसलीये नही निकलना मेरको यहासे!

एक सांगशील..??

अब नही बोली तो भी तु थोडी ना सूनने वाली ती थोडं हसुन म्हणाली.

तिला अस हसताना पाहून माझ्याचेहऱ्यावर पण हसु उमटलं. 
तुझ्या कडे  इतके जण येतात , मग प्रेम अस कधी कुणावर झालं नाही का..?

ह्यावर ती कुत्सिक हसली, इस दुनियाका सबसे बडा झूठ क्या हे पता हे..? प्रेम..., समर्पण! जर कुणी कुणावर खर प्रेम केलं असत तर आमची गरजच नसती. इथे फक्त लोक शारीरिक भुक भागवायला येतात,  त्यांना त्यांच्या शरीराची भुक भागवायची असते आणि मला पोटाची.भावनांना आमच्या एरियात किंमत नाही. 
ती बोलत होती त्यातला एकूण एक शब्द जरी खरा होता. तरी ह्या गोष्टी पचवायला खुप जड चालल्या होत्या, कुठल्या समाजात राहतो आपण ? इथे महिलादिनाच्या दिवशी महिला काय आहेत हे सांगून सांगून थकत नव्हते कुणी तर दुसरीकडे हीच एक महिला आपल्या पोटासाठी , नाही फक्त दोन वेळच्या भुकेसाठी स्वतःला रोज विकते , अजून काय दुर्दैव म्हणावं. ना घर , ना दार, कुणी विचारणार नाही, कुणाला तिच्याशी काही घेणेदेणे नाही, तिच्या भावनां तर जणू तिने केव्हाच दफन केल्या. विचार केला तर सगळच कठीण ,आपण फक्त तिला वाईट, घाणेरडी, वेश्या हे टॅग लावुन मोकळे. पण तिला हे बनवणारे पण आपल्या पैकीच आहेत हे मात्र आपण विसरून जातो.

इतक्यात माझा फोन वाजला, 
अग किती वेळ आम्ही वाट पाहतोय..? समोरून माझा भाऊ होता.

हो आलीच दोन मिनिटं!

जा , होगया ना अब! ती म्हणाली.

हा, तुझं नाव काय म्हणाली.

रेश्मा, शंणो, गुलाबो, डॉली, हेमा जो तेरेको अच्छा लगे ओ! यहा घंटो मे नाम बदलते हे !

बापरे, हिला काहीही वाटत नाही आहे, आणि मला कालच माझं आणि माझ्या आईच  नावावरुन झालेलं भांडण आठवलं. माझं घरी एक आणि बाहेर एक अशी दोन नाव का ह्यावरून किती बोलली मी आईला.  आणि हिची तर काही अशी नावाने ओळखच नाही.

और सुन , ती म्हणाली.

क्या...?

अब कभी गलतीसे भी इस रास्ते मत दिखाना, इकडे आलेल्या कुठल्याच मुलीला चांगल्या नजरेने नाही पाहत, ती बोलत होती.

तितक्यात तिच्याकडे एक माणुस येत होता दलाल असावा बहुतेक. तिने त्याला येताना पाहिलं. आणि मला निघण्याचा इशारा केला. 
मी ही काही न बोलता निघाले, एव्हाना माझा साधेपणाचा माज, तिच्या भपकेपणाची घृणा सगळच गळून पडलं होतं. तिने जर तस केलं नाही तर ती जगु शकणार नाही, ह्या सत्याची जाणीव झाली होती. आता तिच्या मनातल्या रागाची जागा करुणेने घेतली होती. एक जळजळीत सत्य ऐकूण मी निघाले होते. पुन्हा कदाचित ती भेटेल, की नाही माहिती नाही .पण ही दरी कधीही न भरून निघणारी आहे ह्याची मात्र जाणीव झाली. त्याही पेक्षा खंत ह्या गोष्टीची आहे की खंत वाटुनही मी ह्यांच्यासाठी काहीही करू शकत नाही.
समाप्त.
©Neha R Dhole.

पत्र एका युगपुरुषाशास

आदरणीय स्वामीजी,

स्वामीजी, तुम्हांला पत्र लिहिण्याची ही पहिलीच वेळ काय , पण आपण तर नेहमीच एकमेकांच्या संपर्कात असतो फक्त पत्रव्यवहाराची ही वेळ पहिलीच. लहानपनापासून  तुम्ही मला पुस्तकांच्या माध्यमातुन भेटायला येत होतात, अगदी ज्याच्या डोक्यावर आई थंड पाणी ओतायची त्या बिले पासुन तर तुमच्यातला तो निर्भय, साहसी पण परिस्थिती ने खचून गेलेला नरेंद्र पण मला खुप जवळचा वाटला. कालीमतेला जाऊन मला ज्ञानदे वैराग्यदे , म्हणणारा नरेंद्र पुन्हा होणे नाही. पण तुमची खरी ओळख म्हणजे स्वामी विवेकानंद. आणि त्यातही काही लोक  धर्मपरिषदेत माझ्या बंधुनो आणि भगिनींनो म्हणुन संबोधले म्हणूनच ओळखतात.असो, तो आपला विषय नाही. तुम्हाला त्या लोकांची किवच येत असणार.
          165 वर्षांपूर्वी तुम्ही इथे जन्माला आला. तुमचं आयुष्य अवघ 39 वर्षे. त्यात 9 वर्ष सतत प्रवास. का केला तुम्ही इतका प्रवास का फिरलात जगभर..? कारण आपल्या संस्कृतीच्या प्रचारासाठी. तुम्ही आपल्या भारतीय संस्कृतीला जननी म्हणून संबोधल. तुम्ही 165 वर्षांपुर्वी सांगत होता माझा देश काय आहे. आपले वेद काय आहेत. आणि तेव्हा विदेशातल्या त्या लोकांना ते पटलं.  भगवा वस्त्र परिधान करून ज्यांनी लोकांना आपला धर्म पटवून दिला.  तुम्ही त्या काळी नेहमी म्हणायचा मी भारताला लगेच स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो. पण तुम्हाला ते टिकविता येणार नाही. किती दूरदृष्टी, असा योगी भारतासारख्या देशात जन्माला येतो, पण आम्ही काय करतो तर तुमची शिकवण आचरणात आणत नाही. पण हल्ली आणि आम्ही आमचे मुळंच विसरलो. तुम्हांला माहिती आहे का..? माहितीच असणार , सध्या जगभर कोरोना धुमाकूळ घालतोय. त्याने अक्षरशः सगळ्यांना घरात बंदिस्त करून ठेवलंय. पण ह्या कोरोनाने पुन्हा जगात एक गोष्ट सिद्ध केली. की आपली भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ आहे, आज पुन्हा सगळे भारतीय संस्कृती कडेच वळतात आहे.  आपल्या संस्कृतीला निरर्थक किंवा पोकळ म्हणणाऱ्या आपल्याच लोकांना ही चांगलीच चपराक आहे. जे तुम्ही पटवून देण्याचा प्रयत्न केला, आज 150 वर्षांनी ते लोकांना पटलं. खरच तुमच्या दूरदृष्टीला सलाम ! भारत महासत्ता होण्याचं तुमचं स्वप्न नक्कीच आता पूर्ण होणार!
          तुम्ही काय मागितलं होत फक्त शंभर युवक , आज माहिती नाही तुम्हाला मिळतील की नाही , तुम्ही आज साहित्यरूपी आमच्यातच आहात, पण हे साहित्य वाचणाऱ्याचा एक ठराविक  वाचकच आहे. तुम्ही काय होतात हे वाचल्याशिवाय कळणार नाही, आणि खंत म्हणजे तुम्ही इतिहासाच्या पुस्तकात शिकवल्या जात नाही. आम्हाला तो इतिहास शिकवल्या जातो ज्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही, आम्हाला लेनिन शिकवतात, हिटलर शिकवतात पण विकेकानंद  नाही. तुम्हाला त्या गोष्टींचा फरक पडत नाही.तुम्ही नेहमीच सांगत आला आहात, आपण फक्त आपलं कर्तव्य करायच. स्वामीजी तुम्ही म्हणजे तारुण्याचा उत्स्फूर्त झराच आहे. देशाचा तरुण कसा असावा तुमच्या सारखा, पण इथे आदर्शांबद्दल मी मौन बाळगलेलच बर. पण तुमच्या सारख्या निर्भीड, साहसी एका युगपुरुषाची सध्या खूप गरज आहे. मी पुन्हा जन्म घ्या म्हणणार नाही कारण तुम्ही आमच्यासाठी  चिरंजीवीच आहात. आणि जसं की तुम्ही म्हणाला होता की आपली संस्कृती हे जीवन कसं जगायचं हेच शिकवते, आता हे 150 वर्षांनंतर जगाला पटण्याची वेळ आली आहे. जसं की तुम्हाला माहितीच आहे  इकडे तर कोरोनाचा हाहाकार चालु आहे, पण नक्कीच तुम्ही सांगितलं तस विज्ञान आणि अध्यात्माचा मेळ घालणारी आपली संस्कृती असल्यामुळे त्यातुन लवकर बाहेर पडु आणि पुन्हा सर्व सुरळीत होईल हीच अपेक्षा.
                                                तुमचीच शिष्या,
                                                   नेहा.
©Neha R Dhole.


शोध स्वतःचा

आपण आयुष्यात ठरवलेलं कधी काही होत का..? नाही, आणि माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर अजिबात नाही. इतकं शहाणपणाचं जगून कधी समाधान मिळत का...? मग थोडंस वेड होऊन जगायला काय हरकत आहे..?. घड्याळ्याच्या वेळा पाळता पाळता नेहमीच आयुष्याच्या वेळा चुकत जातात.  दुसऱ्यांच्या चुका काढता काढता ,स्वतः च्या चुका मात्र लपत जातात! . थोडसं अपेक्षेचं ओझं कमी करून , एकदा आरशात बघावं इतरांकडून अपेक्षा ठेवताना आपण त्या किती पूर्ण करू शकतो त्याचा कधीतरी ताळेबंद मांडुन पहावा. मला वाटतं जगण्यातले अर्धे प्रश्न तिथेच सुटतील. आरश्यातल्या प्रतिबिंबाकडे पाहुन अभिमानाने म्हणता आलं पाहिजे, "आतापर्यंत आयुष्यात भेटलेला सर्वोत्तम माणुस तुच! " .  चला मग प्रयत्न करूया इतरांच्या गर्दीमध्ये जाऊन हरवण्यापेक्षा, स्वतःला शोधलं तर काय हरकत आहे..? . ©Neha R Dhole.

Saturday 14 September 2019

हे असच चालायचं

आज किनाऱ्यावर तुझी मूर्ती दिसली, म्हंटल पटकन जाऊन उचलावी इतक्यात महानगरपालिकेच्या लोकांनी उचलून कचऱ्यात टाकली😒.
दहा दिवस सिंहासनावर बसलेला तू अकराव्या दिवशी कचऱ्यात दिसला😑. इथे तुझी ही गत🙄 तर आम्ही तर अगदी साधी माणसे!

हे असच चालायचं!😉
©Neha R Dhole

Friday 13 September 2019

प्रिय बाप्पास



  काल तु आम्हाला सोडून गेलास, खर तर कुठे हे तुला कसे विचारावे हाच प्रश्न आहे. कारण संपुर्ण पृथ्वीवर अधिराज्य गाजविणारा तू, आम्हीच तुझ्या आश्रयाला आलेलो आणि तरीही आम्ही तुला कसे विसर्जित करतो ? हा मला नेहमी पडत आलेला प्रश्न पण असो, तू गेले दहा दिवस आमच्यासोबत राहिला आणि काल गेला. पण तुला पुढच्या वर्षीसाठी काही सूचना. पहिली एक तर लवकर ये!दुसरी आणि जातांना ना ते दहा दिवसांच चैतन्य मात्र नेवू नको ते इथेच ठेवून जात जा! आणि खर तर टिळकांनी ज्या कामासाठी तुझी निवड केली तरी ती म्हणजे सार्वजनिक एकात्मता ती मात्र नांदू दे! बस्स इतक्या सूचना खूप!
       तुला माहिती आहे का ? म्हणजे माहितीच असणार आम्ही फार व्हर्चुअल झालोय सध्या, सगळं कस एका क्लीक वर असत आमच पण तुझ्या साठी नाही बरका! अजूनही आम्ही तुझ्या दर्शनाला रांगेतच उभ राहतो. जगात सगळ्या गोष्टींसाठी आमच्या कडे वेळ नाही पण बाप्पाच्या दर्शनाला आम्ही वेळ काढू. पण तू फार लकी आहेस! माहिती आहे का? कारण हल्ली आम्हाला कुणासाठीही वेळ नाही म्हणणारे आम्ही काल गेले दहा दिवस सतत तुझ्या सेवेत आणि कालचा जल्लोष बघून तर तुलाही कळलं असेल की इतर सगळ्या गोष्टी विसरून तुझ्या साठी सगळे एकत्र आले. छान वाटल पाहून. पण असेच नेहमी एकत्र येवू दे! अशी सगळ्यांना बुद्धी दे. खर तर निरोपाची वेळ ही कुणालाच नको असते पण त्यातही तुझी निरोपाची तऱ्हाच वेगळी निरोपही किती उत्साही असू शकतो हे तुझ्या निरोपाच्या वेळी कळत.
         ह्या दहा दिवसांमध्ये आम्ही काही चुकलो असलो तर शिक्षा दे, माफी नको म्हणजे पुन्हा चुका घडणार नाही. आणि तसा तुला आमच्या कडून बराच त्रास झाला असेल, खूप लोकांनी खूप गाऱ्हाणे सांगितले असतील, पण तरीही तू पुढच्या वर्षी लवकर यायचं! आणि तू येणार कारण आमच्यापेक्षाही तुझं आमच्या वर जास्त प्रेम आहे आणि ते असच टिकवून ठेव! चल मग भेटत जाऊ अधून मधून मंदिरात........!
                                                 
©Neha R Dhole.